जेएनएन, बीड: मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्धवस्त झाला आहे. पिकांचे प्रचंड नुकसान, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई आणि शेतीतील गुंतवणुकीवर पाणी फिरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बीड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करत सरकारकडे शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत आणि कर्जमुक्ती करण्याची मागणी केली आहे.

‘शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा’

“शेतकरी सध्या अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. अशा वेळी सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. अन्यथा आम्ही शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू.” असं ठाकरे म्हणाले. 

पीएम केअर फंडातून थेट शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणीही ठाकरेनी केली. ठाकरे यांनी सरकारला स्पष्ट इशारा देत सांगितले की, “कर्जमुक्ती न केल्यास जनतेचा रोष अनावर होईल आणि आम्हीही शेतकऱ्यांच्या लढ्यात रस्त्यावर उतरणार.”

ठाकरे यांनी बीडसोबतच धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील पूरग्रस्त व नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली. अनेक शेतकरी पिकं वाचवण्यासाठी कर्जबाजारी झाले. आता हाती काहीच शिल्लक नाही, अशी व्यथा शेतकरीने ठाकरे यांच्यासमोर मांडली.