जेएनएन, मुंबई: धाराशिव जिल्ह्यात (Dharashiv) परंडा तालुक्यातील साकत येथे मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गावामध्ये पाणी शिरले आहे. पूर परिस्थितीमुळे साकत गावाचा संपर्क तुटला असून तिथे 12 नागरिक अडकले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दूरध्वनी करून साकत गावात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले आहेत.

एनडीआरएफचे पथक पाठवण्याची सूचना

साकत गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाठवावे तसेच  हेलिकॉप्टरचीही व्यवस्था करावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना सज्ज ठेवावे

राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्य शासन लक्ष ठेवून आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे.पूरस्थितीमुळे धोक्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे, बचाव व मदत करण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना सज्ज ठेवावे,अशा सूचनाही त्यांनी दिले आहेत. 

या संकटाच्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, नुकसान झालेल्या नागरिकांसोबत आहे. त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी दिला.

    सुप्रिया सुळेंची विनंती

    दरम्यान, खासदार सुप्रीया सुळे यांनीही ट्वीट करुन मंत्र्यांना पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याचे म्हटले, मराठवाड्यातील बहुतांश भागात संततधार सुरु आहे. धाराशीव जिल्ह्यातील लाखी, ता. परंडा येथे पांडुरंग पिंगळे (मो. नं. 9623435954) आणि बाळू गायकवाड (8668293749) यांचे कुटुंबीय पावसामुळे अडकून राहिले आहे. ते ज्याठिकाणी आहेत त्या गावाचा इतर गावाशी संपर्क तुटलेला आहे. धाराशीवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की, त्यांना तातडीने मदत पोहोचवावी, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

    हेही वाचा – GST चे श्रेय घेताना आठ वर्ष वाढीव दराने केलेल्या लुटीचीही जबाबदारी घ्यावी - काँग्रेसची पंतप्रधानांवर टीका