जेएनएन/एजन्सी, छत्रपती संभाजीनगर: बीड जिल्ह्यातील एका मशिदीत जिलेटीन कांड्या लावून स्फोट घडवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या 2 जणांविरुद्ध बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA) लागू करण्याची मागणी माजी खासदार आणि AIMIM नेते इम्तियाज जलील यांनी सोमवारी केली. तसंच, महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश नाही होऊन देणार, असं ते म्हणाले.
आरोपींना अटक
गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या उत्सवाच्या आधी, रविवारी पहाटे गेवराई तालुक्यातील अर्धा मसला गावातील एका मशिदीत स्फोट झाला. या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही, मात्र इमारतीच्या आतील भागाचे नुकसान झाले. धार्मिक स्थळ उडवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी काही तासांतच विजय रामा गव्हाणे (वय 22) आणि श्रीराम अशोक सगडे (वय 24) यांना अटक केली आहे.
आमच्या धार्मिक स्थळाचे नुकसान झाले
छत्रपती संभाजीनगरमध्ये ईदच्या नमाज पठणानंतर पत्रकारांशी बोलताना जलील यांनी दोन्ही आरोपींवर कठोर UAPA लागू करण्याची मागणी केली. "एखाद्या छोट्या घटनेला मुस्लिम जबाबदार असेल, तर त्याचे घर बुलडोझरने पाडले जाते. पण स्फोटकांचा वापर करून आमच्या धार्मिक स्थळाचे नुकसान झाले, तर UAPA लागू केला जात नाही. कायदा सर्वांसाठी सारखाच असावा," असे ते म्हणाले.
UAPA लागू व्हायला हवा
अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. "या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईचे आम्ही स्वागत करतो. पण UAPA लागू व्हायला हवा," असे ते म्हणाले.
हेही वाचा - Actress Krutika Chaudhary Murder Case: 8 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर आरोपींची पुराव्यांभावी निर्दोष सुटका
त्याच्या कुटुंबाचा काय दोष?
जलील यांनी नागपूरमधील हिंसाचारात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे घर पाडल्याबद्दलही टीका केली. "आरोपीने काही चूक केली असेल, तर त्याच्या कुटुंबाचा काय दोष? आता हे घर अतिक्रमण असल्याचे सांगितले जात आहे. मग स्थानिक प्रशासन इतकी वर्षे झोपले होते का?" असे त्यांनी विचारले.
3 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी
बीड पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बीड मशिदीत अटक करण्यात आलेल्या आरोपींना 3 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.