एजन्सी, वर्धा. Samruddhi Mahamarg Accident: वर्धा जिल्ह्यात सोमवारी पहाटे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर एका ट्रकने कारला दिलेल्या धडकेत सहा जण ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले.

पहाटे 3  वाजण्याच्या सुमारास विरुल गावाजवळ झालेल्या या अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. या व्यस्त महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

इथेनॉल घेऊन जाणारा एक कंटेनर ट्रक महामार्गावरील इंटरचेंज आयसी-80 (IC-80) जवळ उलटला. महामार्गाची एक लेन सुरू असतानाच, रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला मागून एका ट्रकने धडक दिली आणि दोन्ही वाहनांना आग लागली, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

कारमधील चार प्रवासी आणि ट्रकचे दोन चालक/सहकारी, अशा सहा जणांचा या अपघातात मृत्यू झाला, असे ते म्हणाले. 

हायवे सेफ्टी पेट्रोल, वर्धा पोलीस, अग्निशमन दल आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची पथके बचाव आणि वाहतूक पूर्ववत करण्याच्या कामासाठी घटनास्थळी दाखल झाली. 

उलटलेला कंटेनर अत्यंत ज्वलनशील इथेनॉल घेऊन जात असल्यामुळे, तो सुरक्षितपणे हलवण्यापूर्वी आधी रिकामा करणे आवश्यक होते. सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत खबरदारी घेऊन ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

    मुंबई-नागपूर मार्गिकेवरील वाहतूक विरुद्ध लेनकडे वळवण्यात येत होती, ज्यामुळे बाधित मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

    नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुढील काही तास समृद्धी महामार्गाचा वापर टाळण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला. नागरिकांनी नागपूर-अमरावती महामार्गाचा वापर करून अमरावती गेट इंटरचेंजद्वारे पुन्हा महामार्गावर यावे, असे आवाहन त्यांनी केले. अपघातस्थळ सुरक्षितपणे मोकळे करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

    विशेष म्हणजे, महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार, 2025 मध्ये समृद्धी महामार्गावर 185 अपघात नोंदवले गेले आहेत, जी 2024 मधील 137 या आकड्याच्या तुलनेत 35 टक्क्यांनी वाढ आहे.

    विदर्भातील सर्वात मोठे शहर आणि देशाची आर्थिक राजधानी यांना जोडणारा हा 701किमी लांबीचा सहा-लेनचा प्रवेश-नियंत्रित (access-controlled) महामार्ग डिसेंबर 2022 पासून टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. देखरेख सुधारण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी सध्या एक 'इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' कार्यान्वित केली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते.