नवी दिल्ली: आरबीआयच्या गव्हर्नरने पतधोरण जाहीर केले असून व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 5.25 % वर अपरिवर्तित आहे. त्यामुळे, गृहकर्जासह तुमच्या बँक कर्जाच्या ईएमआयमध्ये तुम्हाला कोणताही दिलासा मिळणार नाही.

ते म्हणाले की, अलीकडील महागाई वाढ प्रामुख्याने अन्न आणि इंधनामुळे झाली असून, आतापर्यंत व्यापक भाववाढीचे फारसे संकेत मिळालेले नाहीत. गव्हर्नर यांनी असेही नमूद केले की, पश्चिम आशियातील युद्धासंदर्भातील अनिश्चितता कायम आहे, मात्र आता जागतिक विकासात सुधारणा अपेक्षित आहे.

आरबीआयने महागाईवर काय म्हटले?

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, किरकोळ महागाई अपेक्षेपेक्षा जास्त आहे. प्रामुख्याने अन्न आणि इंधनाच्या किमतींमुळे, मुख्य महागाई नजीकच्या काळात आणखी वाढेल आणि 2027 आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ती उच्चांक गाठेल, त्यानंतर ती नियंत्रणात येईल. मौल्यवान धातू वगळता, मूल महागाई नियंत्रणात असून पूर्वीच्या अंदाजांनुसारच आहे.

पॉलिसी रेपो रेट जैसे थे

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी पतधोरण निवेदनात म्हटले आहे की, "पतधोरण समितीची (MPC) चालू आर्थिक वर्षातील तिसरी द्वि-मासिक बैठक 'पॉलिसी रेपो रेट'बाबत चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी 3, 4 आणि 5 ऑगस्ट रोजी झाली. बदलत्या व्यापक आर्थिक (मॅक्रो-इकॉनॉमिक) आणि वित्तीय घडामोडी तसेच भविष्यातील परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतर, समितीने 'पॉलिसी रेपो रेट' 5.25 टक्के या पातळीवर कायम ठेवण्याचा एकमताने निर्णय घेतला. परिणामी, 'स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी' (SDF) दर 5 टक्के, तर 'मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी' (MSF) दर आणि 'बँक रेट' 5.25 टक्के यावर कायम राहतील. तसेच, समितीने 'तटस्थ भूमिका' (neutral stance) कायम ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे."

    गवर्नर जीडीपी बद्दल म्हणाले...

    आरबीआयने आर्थिक वर्ष 2027 साठीचा आपला जीडीपीचा अंदाज पूर्वीच्या 6.6  टक्क्यांवरून वाढवून 6.7 टक्के केला आहे. रिझर्व्ह बँकेने दुसऱ्या तिमाहीसाठीचा आपला विकास दराचा अंदाज वाढवला आहे.