Ncp Sharad Pawar Party : गेल्या जवळपास ७ ते ८  वर्षांपासून शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडणारे जयंत पाटील (Jayant patil) यांनी अखेर आता पदाचा राजीनामा दिला. जयंत पाटील पायउतार होताच माजी मंत्री शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाची राज्य कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली. 

निवडीनंतर काय म्हणाले शशिकांत शिंदे -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी पक्ष संघटनेला अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्ष विस्तारासाठी राज्यभर सक्रियपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोरगरीब जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देत लवकरच राज्यभर दौरा करणार असून आर. आर. पाटलांप्रमाणे संधीचे सोने करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला आगामी रणनिती सांगितली.

शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, शरद पवार साहेब आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष केल्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेला ग्वाही देऊ इच्छितो, ज्या नेत्याने गोर-गरीब जनतेसाठी अहोरात्र कष्ट केले, त्या नेत्यांच्या पक्षाच्या एक कार्यकर्ता म्हणून राज्यातील अनेक प्रश्नांना आणि अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करेन. या काळात पक्ष संघटना वाढवत असताना, ही पक्ष संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेल, महाराष्ट्रात पक्षाची सत्ता आणण्यासाठी दिवसरात्र कष्ट करेल, असे शशिकांत शिंदे म्हणाले. 

शशिकांत शिंदे म्हणाले की,पक्षातील अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी पात्र असताना सुद्धा मला मिळालेल्या संधीचे सोने करेन. सामान्य कुटुंबातील व्यक्ती नेता कसा होतो, हे आर. आर. पाटलांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जनतेच्या प्रश्नांसाठी आणि शासनाच्या आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज तर उठवणार आहेच, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात जनतेची जागृती करेन, अशी ग्वाही देतो, असेही शशिकांत शिंदे यानी बोलताना म्हटले आहे.

    पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की,पूर्वीच्या राजकारणाची आणि आताच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. हल्ली सत्ताबदल हा अधिकार, सत्तेच्या माध्यमातून, आमिष दाखवून केला जातो. या माध्यमातून हे पहिले आव्हान आहे. या सर्व बदललेल्या यंत्रणेला लोकांमध्ये जागृत करुन, सर्वसामान्य जनतेसाठी काम करेन. महिन्याभरात पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, राज्याचा दौरा करेन, पक्षसंघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करेन. नवीन तरुणांना संधी देईन. सर्व धर्मीय तरुणांना एकत्र करुन संघटना मजबूत करेन, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.