जेएनएन, मुंबई. Onion Price Issue : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कांद्याचे दर उतरल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळावा व त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी कांद्यालाही इतर पिकांप्रमाणे हमीभाव दिला जावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे आमदार जयंत पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

जयंतराव पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून म्हटले की,  बांगलादेशकडून कांद्याची आयात थांबवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महाराष्ट्रातील नाशिक, नगर तसेच इतर भागात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता, कांद्याचे दर दिवसेंदिवस घसरत चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

कांद्याची साठवणूक करताना सडण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकरी कमी भावात कांदा विकण्यास भाग पडत आहेत. कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. पीक आल्यानंतर त्याची योग्य साठवणूक करणे हे देखील मोठे आव्हान असते. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था ढासळत चालली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकारीचा विचार करूनच इतर पीकप्रमाणे कांदाला सुद्धा हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.  शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने तात्काळ पावले उचलावीत आणि कांद्यालाही इतर पिकांप्रमाणे हमीभाव दिला जावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

लासलगाव बाजार समितीमधील कांद्याचे आजचे (मंगळवार) दर खालीलप्रमाणे-

उन्हाळ कांदा बाजारभाव

कमीत कमी.   - 500

    जास्तीत जास्त - 2100

    सर्व साधारण -   1460