जेएनएन, मुंबई. महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण मदतीची घोषणा केली नाही. आता मुख्यमंत्री दिल्लीत गेले पण तिथे त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सुरजागड लोखंड खाणीसंदर्भात चर्चा केली हे अत्यंत त संतापजनक असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून भरीव पॅकेज घेऊनच परत यावे, अन्यथा तेथेच थांबावे, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील कामखेड, गुळभेली, राहेरा दाभोळ तांडा नळकुंड, व बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट, पाडळी या गावांमध्ये अतिवृष्ठी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत होते.
3 ऑक्टोबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलन
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये तसेच जमीन खरवडून गेली त्यासाठी एकरी 2 लाख रुपये द्यावेत, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावेत यासह शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागण्या काँग्रेस पक्षाने केल्या आहेत. पण सरकारने जी मदत जाहीर केली आहे, ती अत्यंत तुटपुंजी असून हेक्टरी 3 हजार रुपयेही पदरात पडणार नाहीत. काँग्रेस पक्षाने याआधी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. आता पुन्हा 3 ऑक्टोबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
88 हजार कोटी रुपयांच्या महामार्गाला मंजुरी देताना…
काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना नेहमीच मदत दिली मग आताच्या सरकारलाच काय अडचण आहे? असा प्रश्न विचारून पैशाचे सोंग आणता येत नाही. या अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाचा समाचार घेत, अजित पवार यांना लाज वाटली पाहिजे, अदानीच्या फाईलवर सही करताना, 88 हजार कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देताना त्यांना हे सुचत नाही का? असा सवाल सपकाळ यांनी केला.