जेएनएन, मुंबई: दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम-91 अन्वये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची (UDID CARD) पडताळणी करण्यात येणार आहे.
सर्व जिल्हा परिषदांना सूचना
विभागाकडून त्याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत. व्यांगत्वाच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने ही पडताळणी करण्यात येत असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.
दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींनाच शासनमान्य लाभ
जिल्हा परिषदांमधील संबंधित सर्व विभागांतर्गत शिक्षण, आरोग्य, बांधकाम तसेच सर्व विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करून लाक्षणीक दिव्यांगत्व (Benchmark Disability) असलेल्या व्यक्तींनाच शासनमान्य लाभ देण्यात येणार आहेत.
लाभ अनुज्ञेय केला जाणार नाही
पडताळणीअंती बनावट व नियमबाह्य प्रमाणपत्र किंवा 40 टक्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असल्याचे आढळल्यास संबंधितांना लाभ अनुज्ञेय केला जाणार नाही. अशा व्यक्तींना दिलेले लाभ बंद करण्यात येतील व त्यांनी घेतलेल्या लाभाबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
पडताळणीअंती अपात्र ठरल्यास होणार कारवाई
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम-91 नुसार, अपात्र व्यक्तीने लाभ घेतल्यास किंवा घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यास दोन वर्षांपर्यंत कारावास, एक लाखापर्यंत दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे पडताळणीअंती अपात्र ठरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर संबंधित तरतुदीनुसार कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.