जेएनएन, मुंबई. Maharashtra weather update : अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. थंडीचा कडाका वाढत असून, ढगाळ वातावरणमुळे थंडी वाढत आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत तापमानात काही अंशांची घट नोंदवली जाईल, तसेच या दोन्ही विभागांसाठी थंडीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात सकाळच्या वेळेत गारठा अधिक जाणवत असून रात्री तापमान झपाट्याने घसरत आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाने पुन्हा एकदा 7 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे शेतकरी, सकाळी प्रवास करणारे नागरिक आणि पर्वतीय भागातील रहिवाशांना थंडीचा चटका प्रकर्षाने जाणवत आहे.
विदर्भात मात्र चक्रीवादळाचा प्रभाव वेगळा जाणवेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या ठिकाणी आकाशात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलका पाऊस किंवा रिमझिम सरी पडू शकतात. ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील रात्रीच्या तापमानात फारशी घट होणार नसली तरी दिवसा वातावरणात आर्द्रता आणि थंड राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यातील नाशिक, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, जळगाव, परभणी या जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात घट नोंदवली जात आहे. थंडी वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये पिकांवरील थंडीच्या फटक्याबाबत चिंता वाढली असून हवामान विभागाकडून सावधगिरीचे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील 3 ते 4 दिवस राज्यात थंडीचा कहर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करावा, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना देण्यात आले आहे.
