जेएनएन, नागपूर: महाराष्ट्रात गणेशोत्सवाला जितके महत्त्व आहे, तितक्याच उत्साहाने गणरायासोबत गौरींचेही स्वागत केले जाते. गणपतीच्या आगमनानंतर काही घरांमध्ये अडीच दिवसांसाठी गौरी अर्थात माहेरवाशिणींचे आगमन होते. त्यांचा घरच्या लेकीप्रमाणे थाटामाटात पाहुणचार केला जातो. पंचपक्वान्नांचा नैवेद्य, साडी-चोळी, दागिने आणि विविध अलंकारांनी गौरींना सजवले जाते.
महाराष्ट्राच्या विविध भागांत हा सण गौरी पूजन, महालक्ष्मी पूजन किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा पूजन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. घरातील सुख-समृद्धी, आरोग्य आणि सौभाग्यासाठी गौरींची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र, या पूजेला केवळ धार्मिकच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे. गौरी पूजनाची सुरुवात कशी झाली आणि या परंपरेमागे कोणत्या आख्यायिका आहेत, जाणून घेऊया.
गौरी म्हणजे नेमके कोणाचे रूप?
हिंदू देवताशास्त्रात गौरीला भगवान शिवाची शक्ती आणि भगवान गणेशाची माता पार्वतीचे एक रूप मानले जाते. विविध धार्मिक ग्रंथांमध्ये गौरीच्या रूपांचा उल्लेख आढळतो. अपराजितपृच्छा या ग्रंथात द्वादश गौरींचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच अग्निपुराणात गौरीच्या सामूहिक पूजेचा संदर्भ आढळतो.
महाराष्ट्रातील काही प्राचीन मंदिरांमध्येही गौरीच्या विविध रूपांच्या मूर्ती आढळतात. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरातील शिव आणि गौरीची कोरीव प्रतिमा त्यापैकी एक मानली जाते. या प्रतिमेत गौरीच्या हातात बीजपूरक असून, त्यांच्या केसांमध्ये फुलांची वेणी दाखवण्यात आली आहे. शिव परिवारातील देवता म्हणून गौरीला धार्मिक परंपरेत विशेष स्थान आहे.
गौरी पूजनामागची आख्यायिका
गौरी पूजनाशी संबंधित एक प्रचलित आख्यायिका महालक्ष्मी गौरीशी जोडली जाते. आख्यायिकेनुसार, एकदा असुरांच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या स्त्रिया महालक्ष्मी गौरीच्या शरण गेल्या. त्यांनी आपले सौभाग्य अक्षय राहावे आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी, अशी गौरीकडे प्रार्थना केली.
स्त्रियांची प्रार्थना ऐकून गौरीने असुरांचा संहार केला आणि त्यांच्या शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींसह पृथ्वीवरील प्राणिमात्रांचे कल्याण केले, अशी आख्यायिका सांगितली जाते. महालक्ष्मी गौरीच्या कृपेने आपले सौभाग्य प्राप्त झाले, अशी श्रद्धा निर्माण झाल्यानंतर स्त्रिया गौरीची पूजा करू लागल्या, असे या आख्यायिकेत सांगितले जाते.
Disclaimer: या लेखात सांगितलेले उपाय/फायदे/सल्ला आणि विधान फक्त सामान्य माहितीसाठी आहेत. दैनिक जागरण येथे या लेख वैशिष्ट्यात लिहिलेल्या गोष्टींचे समर्थन करत नाही. या लेखात अंतर्भूत माहिती विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचने/मान्यता/धर्मग्रंथ/दंतकथा यांतून संग्रहित केली गेली आहे. वाचकांना विनंती आहे की लेखाला अंतिम सत्य किंवा दावा मानू नये आणि आपल्या विवेकबुद्धीचा वापर करावा.
